हे वर्णन पाहा -
"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."
हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने.
यातून संभाजीराजांची कोणती प्रतिमा साकारते?
आता हे वर्णन पाहा -
"युवराजपदी असतानाच संभाजीराजांनी 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता... एका तत्कालीन कागदात एका खटल्यातील वादी आपली तक्रार प्रल्हाद निराजी व कवि कलश यांच्याकडे सोपविली गेल्याचे पाहून खुद्द संभाजीराजांकडे तक्रार करताना म्हणतात, साहेब सर्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऎसा करिताती. ऎसे असोन माझे पारिपत्य होत नाही."
हे नमूद केले आहे वा. सी. बेंद्रे यांनी आपल्या 'छत्रपती संभाजी महाराज' या पुस्तकात. (पान 37, 38)
यातून संभाजीराजांचे कोणते चित्र उभे राहते?
आणि आता संभाजीबद्दल जनमानसात असलेले गैरसमज आठवून बघा.
लोक समजतात -
मराठी साम्राज्याचा हा युवराज दुर्वर्तनी होता. दुराचारी होता. मद्यासक्त होता. स्त्रीलंपट होता. बलात्कारी होता. राज्यबुडवा राजा होता! काही तत्कालीन ऎतिहासिक साधनांतूनही संभाजीबद्दलचे असेच काळेकुट्ट चित्र रंगविलेले आढळते.
मल्हार रामरावाची बखर सांगते -
"... परंतु (संभाजीराजे) उग्र प्रकृती. शिवाजीमहाराजांचे मर्जीनुसार वागणे पडेना ऎसे होऊ लागले. काही दिवस राजगडी राहून रायगडी गेले... त्यांचा व्रतबंध करून युवराजाभिषेक करावासे मनात आणून व्रतबंध केला. परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची! कोण्हे एके दिवशी हळदकुंकू समारंभ शीतलागौरी यास सर्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार त्यात कोण्ही रुपवान स्त्री आली. तिजला महालात नेऊन बलात्कार - अविचार जाला. हे वृत्त महाराजांसही समजले. ते समयी बहूत तिरस्कार येऊन बोलले जे राज्याचे अधिकारी हे, अगम्यागमन श्रेष्ठ वर्णीचे ठायी जाले; सर्व प्रजा हे राजाचे कुटुंब आप्तसमान, हे पुत्र जाले तरी काय करावयाचे? यांचा त्याग करीन, शिक्षा करीन. ऎसे आग्रह करून बोलले. ही बातमी संभाजी महाराज यांस समजली. त्याजवरून दोन घोडियांवरि आपण व स्त्री ऎसे बसोन, पांच पंचवीस माणसे मावले आपले खासगीची घेऊन रात्रीसच निघोन पाचवडास असता तेथून गेले. ते वेळे दिलेलखान औरंगाबादेस होते त्यांजपाशी गेले... बहूत सत्कार करून ठेविले... "
म्हणजे संभाजीराजांनी एका महिलेवर राजवाड्यात बलात्कार केला आणि मग शिवाजीराजे शिक्षा करणार या भयाने ते दिलेरखानाकडे पळून गेले, असे मल्हार रामरावाचे म्हणणे आहे. याला महमद झुबेरी याने आपल्या बुसातिन-उस-सलातीन (विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास) या ग्रंथात दुजोरा दिला आहे. या ग्रंथातील कथा अशी -
"संभाजी याणी दिलेरखानापासी जाऊन पोहचण्याची कैफियत असी आहे की, सिवाजी कित्येक कामाबद्दल संभाजीसी त्रासून कंटाळला होता. या दिवसांत शहरनवीस म्हणदे हुकमाचे शेरे लिहिणारा कामदार होता. त्याचे कन्येवर संभाजी फार आषक, म्हणजे लुब्ध, जाहला होता. येणेकरून संभाजीविसी सिवाचे मनात फारच वाकडेपणा येऊन सिवाजी अत्यंत त्रासला होता. अशा प्रकारे की, संभाजीचा केवळ शत्रूच जाहाला आणि सिवाजीने मनात आणिले की, संभाजीस हरएक बाहान्याने पकडून ठार जिवे मारावा किंवा कैद करावा. संभाजी याणी हा सिवाजीचा इरादा ओळखून संशयांकित जाहाला. आपण दिलेरखानाकडे निघोन जावे असा निश्चय केला. आपण जातीने जाऊन पोहचण्यापूर्वी आधी एक पत्र आम्ही आपलेकडे येतो अशा मजकुराचे लिहून दिलेरखानाकडे पाठविले. त्यानंतर जातीनेही त्या पत्राचे लागोपाठच दिलेरखानाकडे निघाला."
एका इंग्रजी बातमीपत्राने तर याहून कहर केला आहे. त्या पत्रात असे म्हटले आहे, की संभाजीने आपल्या बापास विष देऊन ठार मारले, अशा बातम्या आहेत. ते पत्र असे -
"For these many days here is a continued report of Sevagee being dead and buried, naming the place of his death, distemper, manner and place of burial. It is reported he was poisoned by his son; his son being informed his father had commanded the watch of Rairee Castle to throw him down over the wall, if he left not going out at nights after the watch was set to meet a daughter of one of his chiefest Brahminees, whose daughter he had debauched; that he was sick, we certainly know, and that his distemper proceeded from the violent pain he had in his head, which was almost rotten..." (English Records on Sivaji - Ed. Shiva Charitra Karyalaya, Pune, Vol II, P. 78)
मराठ्यांचे इतिहासाचे थोर भाष्यकार कै. त्र्यं. शं. शेजवलकर या पत्राबद्दल म्हणतात, "इंग्रजांच्या पत्रातील ही नोंद इतकी सहजरित्या स्पष्ट स्वरूपात आली आहे की तीबद्दल शंका घेणे कठीण आहे..." (श्री शिवछत्रपती - संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर, 1964, पृ. 142-143)
या तिन्ही साधनांमध्ये ज्या स्त्रीचा उल्लेख येतो, तिचे लोककथेतील नाव होते गोदावरी. ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी होती, असे मानले जाते. लोककथेनुसार "गोदावरी नामक एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन संभाजीने तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवले. महाराजांना हे कळताच त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी संभाजीला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज आमचा उद्याचा राजा आहे, असे सांगून शिक्षा रद्द करून घेतली. पण ती माहेरी अगर सासरी जाईना. तिच्यावर भ्रष्ट होण्याचा प्रसंग आल्यामुळे ती सती गेली. संभाजीनेच तिची चिता पेटवली पाहिजे, अशी सती जाताना तिने अट घातली होती. त्याप्रमाणे संभाजीने तिची चिता पेटवली..." ती जिथे सती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची समाधी बांधली. ती अद्यापही तेथे, रायगडाच्या पायथ्याशी आहे, असे सांगण्यात येते.
हे वाचून कोणालाही वाटावे, की हा संभाजी तर सामान्य गुंड होता! पण मग त्याचवेळी तो धर्मवीरही आहे!
आता याची संगती कशी लावायची? की सत्य याच्या मध्ये कुठे तरी आहे?
असे तर नाही ना, की कोणीतरी जाणूनबुजून संभाजीची बदनामी केलेली आहे, त्याच्याबद्दलच्या अफवा पसरविल्या आहेत?
इतिहासाची पाने चाळली, तर दिसते ते हेच, की मराठ्यांचा हा शंभूराजा कधीच दुराचारी, स्त्रीलंपट असा नव्हता.
No comments:
Post a Comment