Sunday, October 17, 2010

संभाजी महाराजांच्या बदनामीचे षड्यंत्र रचले कोणी? - भाग 2

संभाजी महाराजांबद्दल बखरी जे म्हणतात ते खरे मानले, तर मराठ्यांचा हा युवराज बलात्कारी होता. आपला पिता शिक्षा करील या भयाने दिलेरखानाकडे जाऊन त्याने स्वराज्याशी द्रोह केला होता. एवढेच नव्हे, तर इंग्रज पत्रावर भरोसा ठेवायचा, तर त्याने साक्षात् शिवछत्रपतींना विष दिले होते! पण यात ऎतिहासिक स‌त्याचा कणही नाही.

महाराजांवर तेव्हा (1675च्या अखेरीस) विषप्रयोग झालेलाच नव्हता. यावेळी त्यांचा मृत्यूही झालेला नव्हता! ते साता-यावर दीर्घ काळ आजारी होते इतकेच. त्यातही गंमत अशी की, खुद्द इंग्रजांनीच काही दिवसांनंतरच्या बातमीपत्रात (7 एप्रिल 1676) विषप्रयोगाचा कर्ता संभाजी नसून एक न्हावी असल्याचे म्हटले आहे. यामुळे त्या पहिल्या बातमीपत्राचा स‌गळाच डोलारा कोसळला की! आणि शिवाजी महाराज संभाजी दिलेरखानाला मिळण्यापूर्वी त्याला हर बहाण्याने पकडून ठार मारण्याच्या प्रयत्नात होते, या कहाणीची तर विचारही करण्याचे काही कारण नाही.

मल्हार रामरावाची बखर, जी सांगते की संभाजीने राजवाड्यात एका महिलेवर बलात्कार केला, तिच्याकडे तर विशेष काळजीने पाहावे लागते. मुळात ही बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर तब्बल 122 वर्षांनी लिहिली गेली आहे. त्यामुळे तिच्यात सांगोवांगी कहाण्या पुष्कळच असणार हे उघड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही बखर पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. त्याची कारणे मल्हार रामरावाच्या इतिहासात आहेत. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा हा राग नसेलच असे कसे म्हणता येईल? डॉ. जयसिगराव पवार सांगतात, बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटांत, किंवा त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही.

अतिशय विकृत पद्धतीने या मल्हर रामरावाने संभाजी महाराजांची बदनामी केली. त्याने सांगितलेल्या कहाणीवर विसंबून पुढे अनेकांनी संभाजी राजांना काळ्याकुट्ट रंगात रंगविले. पण या बलात्काराच्या कथेत काहीच दम नाही! मल्हार रामरावाने सांगितलेली ही गोष्ट म्हणजे खोटारडेपणाचा कळस आहे. डॉ. पवार सांगतात, "ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते स‌ज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी पावणेदोन वर्षे होता."

वास्तविक ऑक्टोबर 1676 पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते. तरीही मल्हार रामराव, इंग्रजी बातमीपत्र आणि बुसातिन-उस-सुलातिन ही तिन्ही साधने त्यांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगतात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो!

या 'बलात्कार कथे'ची नायिका गोदावरी ही आहे. तिला तर कोणताही ऎतिहासिक आधार नाही. पण मग तिची स‌माधी रायगडाच्या पायथ्याशी दाखविली जाते, ते कसे?
याचे उत्तर आहे - आज रायगडाच्या पायथ्याशी गोदावरीची जी समाधी दाखविली जाते, ती आहे स‌वाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिची स‌माधी! (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 396-397)

संभाजीच्या आणखी दोन नायिका आपल्याकडील चित्रपट, नाटके आणि कादंब-यांनी रंगविल्या आहेत. त्यातील एक आहे तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची स‌माधी पन्हाळ्याच्या परिसरात दाखविली जाते. पण तिचीही गत गोदावरीसारखीच आहे. ही स‌माधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या शूर पुरुषाची आहे! बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडला. त्याची बायको त्याच्याबरोबर स‌ती गेली. या दोघांची ही स‌माधी आहे. आता तेथे उभयतांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत. (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, 1990, पृ. 306-309)
तुळसा हे पात्र तर तद्दन काल्पनिक. ते आत्माराम मोरेश्वर पाठारे या नाटककाराने 1891 साली आपल्या 'संगीत श्री छत्रपती संभाजी' या नाटकात निर्माण केले. या पात्राला लोककथेतही स्थान नाही.

संभाजी महाराजांच्या स्त्रीलंपटपणाच्या कथांची अशी वासलात लागल्यानंतर त्यांच्या चारित्र्यावर 'डाग' राहतो तो स्वराज्यद्रोहाचा.

शंभूराजे दिलेरखानाला का मिळाले, हा मोठा गहन प्रश्न आहे..

No comments:

Post a Comment